मंगळवार, २४ मार्च, २०१५

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-११

हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो!
==============================================
...नंतर काहि वेळातच यजमान-पार्टीचा आणि आमचा स्ट्रॅटेजीक टाइमाअऊट संपतो..आणि आंम्ही आपले परत मधुपर्क-कन्यादानाच्या पुढच्या शो'ला होस्ट करायची तयारी करायला लागतो.इकडे मुलीची आई/वडील/मुलगी इत्यादी सर्व.. होता होइतोपर्यंत (कदाचीत)घड्याळ दिसल्यामुळे..किंवा कार्यालयातल्या(हल्लीच्या)मॅनेजर या चतूर आणि लोकोपयोगी पदामुळे बढतीस चढलेल्या अश्या त्या.."कार्यालयाचा माणूस" नामक सर्वज्ञात-नटाच्या हतात सापडल्यामुळे..स्टेजकडे येऊ लागतात. आणि आंम्ही मुलिच्या आइला..."हं..आता मुलाला कन्यादानाचेवेळी द्यायच्या वस्तू...आणि तुंम्ही जर विशेष काही देणार असाल..तर ते घेऊन या बरंssss" अशी महत्वाची सुचना देतो.पण बरेचदा मुलिच्या आईला या सूचनेतलं ते महत्वाचं जर्राssssही कळत नाही. आणि मग नेमकं,स्कूलबस सुटायला लागल्यावर आपल्या मुलाला वॉटरबॅग द्यायची विसरलेल्या आईसारखी ती ,कन्यादानानंतरचे विधी चालू असताना..मधेच धावत येऊन आंम्हाला विचारते,"अहो आंम्हाला कन्यादानाच्या वेळेला ते--'हे' द्यायचंवतं ना!!!!...सांगितलत का नाही आम्म्हाला???" अता या प्रश्नावर आंमच्यासारखे गुर्जी-लोक..फक्त..."अत्ता आणा...!" एव्हढच उत्तर देऊन आपला कार्यालयीन बाणा जपत असतात.पण याच जागी जर का एखादे वयोवृद्ध...खाष्ट आणि तितुकेच स्पष्ट गुर्जी आणि या मुलिच्या आई नामक यजमानीण बाई असतील तर??????????? तर मग, लगीन र्‍हायलं बाजूला..आणि सांभाळा या तराजूला! अशी वेळ यांच्या भांडणात मध्यस्थीला यावेच लागणार्‍या (त्या..बिचार्‍या!)मुलिच्या बापाची होते!
यजमानीणः-अहो आंम्हाला कन्यादानाच्या वेळेला ते--'हे' द्यायचंवतं ना!!!!...सांगितलत का नाही आम्म्हाला???
खाष्ट गुर्जी:-मsssssग??? कन्यादानाच्या 'अधी' , जी सुचना केलीवती...ती काय फक्त तुमच्या कानांना???
यजमानीणः-हो का??? वा..वा..वा..वा..गुरुजीsssss कोण हो तुमचे गुरु? हे..असले कान-मंत्र देणारे?
खाष्ट गुर्जी:-का हो? झोंबलं का झोंबलं? वेळच्यावेळी सांगितलेलं तेंव्हाच्या तेंव्हा नीट ऐकायची सवय अजून लागली नाही का तुंम्हाला? ........................................ यजमान कुठायत तुमचे?
या टप्यावर म्याच आलेली आहे,याचा सुगावा लागून मुलिचा बाप एकदाचा येतो..आणि "अगं..तू नको त्या वेळी वाद काय घालत्येस? तेंव्हा नै दिलं तर अत्ता द्यायचं.अत्ता दिलस तर कोणी फासावर देणार आहे का तुला?... मsssssग?..जा घेऊन ये जाऊन..काय द्यायचं ते!"
यजमानीणः- ह्हो!!! फासावर कोण देइल? ते बघू तरी. नाही माझी मुंडी पकडण्याआधी पाताळधुंडीत घातला त्याला...तर नाव नाय सांगणार..." असं फणकारत ही मुलिची आई तिच्या कक्षाकडे वस्तू अणण्यास जाते.
आता तो यजमान..भटजींकडे वळतो,"गुर्जी..तुंम्हीपण कशाला तोंडी लागताय? चुकलं म्हणायच..आणि गाडी पुढे न्यायची."
खाष्ट गुर्जी:- हां आंम्ही पुढे न्यायची होय!? ती पण,तुमच्या सौंनी असा हँडब्रेक लावल्यावर ???
यजमानः-(टेकीला येत..) बरं..आता तिच्याकडनं तिच्या ऐवजी मी तुंम्हाला चुकलं म्हणतो.ती आली....की काय कुणाला द्यायचं ते घ्या देऊन...आणि जा पुढे." ...............इत्यादी...इत्यादी...!!!''
आता वरचा प्र-संग अगदी नेहमी घडणार्‍यातलाच असतो असं नाही.पण 'घडला' .. की अगदी असाच घडणार हे नक्की असतं. काय आहे ,की कार्यालयातल्या या खेळात,काही वेळेला काही गोष्टी या आमटीत जास्त पडणार्‍या तिखटा सारख्या किंवा कमी लागणार्‍या हिंगा सारख्या अगदी घडाव्याच लागतात.त्या शिवाय त्या दिवसाची-टेस्ट,खर्‍या अर्थानी डेव्हलप होत नाही. शेवटी मग एकदाचा तो कन्यादानाचा विधी सुरू होतो.आंम्ही आपले संकल्प वगैरे सांगून मुलिच्या बापाला मुलिच्या पाठिशी उभं करतो आणि कन्यादानाचे ...कन्यां कनक संपन्नां कनकाsभरणैर्युतां...वगैरे मंत्र म्हणून अर्थ सांगायला लागतो,आणि इथे मात्र माझ्यासारख्याला हल्ली कायम एक प्रश्न पडतो.शास्त्रातले खरे अर्थ हे बरेचसे कालविसंगत,किंवा सांगितले..तरी त्याची आजच्या काळानुसारंही 'संगती' न लावता येण्यासारखे! अश्यावेळी आपण करायचं काय? मग माझ्या त्या काका'चा सल्ला कानात वाजतो, "आत्मू ..हे बघ..ही धर्मशास्त्रे वगैंरे जी काही असतात ना,ती त्या त्या काळातले आपले विद्वान तेंव्हाच्या सोई बघून लिहितात,आपण आजच्या काळात आहोत हे भान जागृत ठेवायचं..काय समजलास??? मंजे आपोआप उत्तरं सापडतात..कशाला विचाराला हवाय कुणाला???...दे बरं टाळी!" (हा आमचा काका..आयुष्यभर खेडेगावी र्‍हायला,आणि तरी त्याला ही नवजीवनाची संजिवनी कशी मिळाली ? याचं मला अजूनंही कोडं आहे....असो!)
मग मी आपला,काकाचं स्मरण करून सुरु होतो.. आणि मुलाला सांगायला लागतो, "आता मुलिचे वडिल,तुला त्यांची सालंकृत कन्या ..म्हणजे केवळ अंगावरच्या असलेल्या अलंकारांसह नव्हे हो,तर तिला दिलेल्या संस्कार/विद्या/व्यवहार या तीन अलंकारांसह धर्मपत्नी म्हणून स्विकारण्यासाठी देत आहेत...काय? आहे ना मान्य?" मुलागा हो'कारतो.आणि मग पुढे कन्यादानातले पुढचे विधी होऊन,मुलाला मुलिच्या वडिलांकडून नेहमीची (आपली फेमस) धर्मे चं/अर्थे चं/कामे चं ही शपथ देवविण्याची वेळ येते.शपथ देववून होते.तीचे सगळे अर्थ सांगून होतात.सर्व काही छान..होतं.धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
शेवटी एक गोष्ट खरी आहे.धर्मशास्त्रांनी बांधल्या गेलेल्या विवाहासारख्या या ऐहिक-विधींचे अर्थ,पोथ्यांमधे-धार्मिक/जुनाट/चुकीचे/बरोबर कसेही असले तरी..त्याचं फलित हे नेहमीच ऐहीक असतं...असलं पाहिजेही! कन्या-दान..यातल्या दान या शब्दावर आपण आक्षेप घेतला,आणि तो मान्य असला/नसला तरी,आजच्या काळात मुलगा/मुलगी हे दोघेही आपापल्या आई/बापांपासून थोड्या अंतरावर जाऊन का होइ ना? अंतरणारच आहेत, दान होणार आहेत...यापुढच्या काळात,जुन्या आणि आधुनिक अश्या दोन्ही अंगांनी,माणसांच्या इहलौकिकाचा व्यवहार हा शास्त्रांपेक्षा बराचसा वेगळा असणार आहेच.त्यांमुळे आपण जुने विधी केले/सोडले..किंवा नवे विधी आणले/न आणले,तरी त्याचं फळ आजच्या काळानुसारच मिळणार आहे-या अटळ प्राक्तनाला,मानवधर्मशास्त्राचे फलित मानून हृदयामधे घट्ट जपावे.म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! Smile
=================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा